जळगावची सफर - पद्मालय

» शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून छोट्या भाऊजींनी आम्हां दोघांना मोठ्या भाऊजींकडे नेले. तेथे माझी मोठी ताई ऑल्रेडि शेतात गेलेली होती व मोठे भाऊजी घरासमोरील छोट्याश्या बदामीच्या झाडाला कूंपन करीत होते. त्यावेळी मस्त ऊन पडले होते, दूपार होती ना.....! त्यातच अर्धा तास किंवा जरा जास्तच वेळ गेला. फूल जेवण अन त्यातच ते गोड होतं, त्यामूळे मी, गौरव अन छोटे भाऊजी, तिघांनाही सुस्ती आली, अन तिघेही तिथेच जरासं लोळलो...(!) मोठ्या भाऊजींचे जेव्हा काम आटोपले, तेव्हा बहुतेक दुपारचा सव्वा झालेला असावा. लगेच त्यांनी एकदम फास्ट मध्ये आम्हाला उठवलं अन फ्रेश होऊन पटकण रेडी व्हायचं सांगितलं. आम्ही घाई-घाईत रेडी झालो अन जायला निघालो. गौरव छोट्या भाऊजींच्या (प्रविण भाऊजींच्या) तर मी मोठ्या (अनिल भाऊजींच्या) गाडीवर पाठीमागे बसलो. एक गोष्ट सांगायची राहिलीच, हसू नका, कारण मला अजुनही गाडी चालवता येत नाही......! त्यामूळे भाऊजींच्या हातातून गाडी घेण्याचा प्रश्नच नव्हता, बस्स... पाठीमागे बसून आपलं चुप-चाप बसायचं अन ऐश करायची, ती पण अगदी आरामात.....!

आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!


आम्हाला निघून तरी पण बहुतेक एक तास झाला होता. तसं ३० किमी आम्ही अर्ध्या तासात पार केलं असतं, पण प्रविण भाऊजींच्या करिज्माने तर नुसता वैताग आणून सोडला होता. गौरव त्यांच्या पाठीमागे बसला होता, त्यामूळे मला त्याचं हसू येत होतं. वाटेत एक मोठी नदी (इंद्रायणी) होती, खूप भव्य होती, पाणी तसं कमीच होतं पण पुलावरून जाणारी पाईप-लाईन एका ठिकाणी फूटलेली होती, गाडीवर भर ऊन्हात आम्ही गरमीने वैतागलेलो असतांना त्या पाईप-लाईनमधून आमच्या अंगावर पाण्याचे थंड तुषार ऊडले...... अहा...हा....! किती थंडगार वाटलं होतं तेव्हा....! पुन्हा तिथं जाऊन भिजावं वाटत होतं. पण "त्या" करिज्माचा अजुन पत्ताच नव्हता, कुठं हरवले होते कोणास ठाऊक..? तेव्हा आम्ही विचार केला की त्यांना पाहायला मागे जावे, तेव्हाच ते आम्हाला दिसले, लगेच आम्हाला गाडी फिरवावी लागली. थोड्याच वेळात घाट लागला, एकदम सामसूम रस्ता, भरदिवसा......! घाटातून जातांना मस्त मजा वाटत होती. शेवटी १० मिनीटांत आम्ही पद्मालयला पोहोचलो. तेथे गेल्यावर आम्ही गाडी पार्क केल्या अन मंदिराची वाट धरली. त्या दिवशी मंगळवार होता. तेथे दर संकष्ट चतुर्थीला गर्दी असते. अन त्या दिवशी बहुतेक संकष्ट चतुर्थी असावी, त्यामुळेच तिथे गर्दी असावी. जाऊ द्या, मंदिराचा परिसर एकदम भव्य आहे. तसेच शेजारी एक मोठा तलाव आहे, तसे मी फोटो काढले आहेतचं. बाजुच्या चित्रात त्या तलावाचा फोटो बघा.‌‌‌‌‌‍

 अरे हो, मला अन गौरवला अजुन कोणीच सांगितलं नव्हतं की, पद्मालयला नेमकं कशाचं मंदिर आहे म्हणून...! तसं आम्ही बर्‍याच वेळा भाऊजींना विचारलं पण त्यांनी सांगायच टाळलं. शेवटी मंदिरात गेल्यानंतरच कळालं की ते कशाचं होतं.....! तेथे दोन गणपती आहेत, डाव्या सोंडेचा अन उजव्या सोंडेचा... त्याबद्दल तेथे एका बोर्डवर लिहिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे:

श्री गणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, व ९०, ९१ अध्यायात श्री क्षेत्र पद्मालय संस्थानातील स्वयंभू गणेश मूर्तीचा उल्लेख आढळतो. साडेतीन सिध्दी विनायका(पिठा) पैकी श्री क्षेत्र पद्मालय पूर्ण पिठ आहे. यात मोरगांव, राजूर, पद्मालय व अर्धपिठ चिंचवड असा उल्लेख आढळतो.

उजव्या सोंडेचा गणपती:- परशुराम अवताराच्या काळात या प्रदेशात कृतविर्य नावाचा राजा होवून गेला त्याला मुल नव्हते. तो गुरूदत्ताचा भक्त होता. श्री दत्तांनी संकट चतुर्थीचे व्रत पुत्र प्राप्तीसाठी करण्यास सांगितले. एका चतुर्थीस कृतविर्य पुजा करीत असतांना त्याला जांभई आली त्यावेळी त्याने आचमन न करता पुजा विधी तसाच सुरू ठेवला. या चुकीमुळे राणीला हात-पाय नसलेला मुलगा झाला. त्याचे नाव कार्तविर्य ठेविले. त्या मुलाला १२ वर्षे सांभाळले वरील गुरूंनी त्या कार्तविर्याला गणेशाचा बिजमंत्राचा जप करण्यास सांगीतले. याच तलावासमोर बसून कार्तविर्याने तपश्चर्या केली व याच तलावातून प्रवाळयुक्त गजाननांनी कार्तविर्याला स्पर्श केल्यावर त्याला सहस्त्र हात व दोन पाय तयार झाले. त्याचे नाव सहस्त्र अर्जून ठेविले. व त्यांनी सहस्त्र हातांनी त्या श्रींना येथेच थांबण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन उजव्या सोंडेचे श्री गणपती त्याच स्थितीत येथे थांबलेले आहेत.

डाव्या सोंडेचा गणपती:- समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष शंकरांनी प्राशन केल्यावर त्यांच्या शरीराची आग होवू लागली त्यावेळी गळ्यात शेष नागाला धारण केले, त्यामुळे महादेवाच्या शरीराची आग शांत झाली. परंतु शेष नागास गर्व झाला माझ्या सानिध्यामुळे महादेवांना बरे वाटू लागले, महादेवांना हे समजले. त्यांनी शेषांना जमिनीवर फेकले. त्यावेळी शेष पद्मालय क्षेत्री येऊन पडले. शेष नाग दु:खाने फुस्कारू लागला तो आवाज ऐकून नारदमुनी त्यांच्या जवळ आले व पंचाक्षरी गणेशाचा मंत्र दिला. त्यांच्या तपोबळाने १२ वर्षानंतर डाव्या सोंडेच्या आकारात प्रवाळयुक्त गजाननांनी त्या शेष नागाला दर्शन दिले व त्याला धरतीचा भार चांगल्या रितीने सांभाळता यावा अशी शक्ती दिली. व आपल्या पिताश्रींना (महादेवांना) पुन्हा शेषाला गळ्यात धारण करण्यास विनंती केली. माझी मनोकामना जशी पुर्ण केली तसेच येथे येणार्‍या भक्तांची मनोकामना पुर्ण करण्यासाठी आपण येथे थांबावे अशी विनंती शेषनागाने केली. शेष नागाच्या विनंतीला मान देवून आजही डाव्या सोंडेचे गणपती पद्मालय येथे वास्तव्य करून आहेत.



मंदिराच्या परिसरात गर्दी असल्यामुळे तेथे तसं थांबावं वाटत नव्हतं पण आजुबाजुचा परिसर विलोभनिय होता. तेथे आम्ही बराच वेळ फोटो काढत बसलो. त्यांची लिंक या पोस्टच्या शेवटी दिलीयं. मंदिरातील एक भव्य घंटा बाजुच्या प्रतिमेत पहा. तेथील एका पुजेच्या साहित्याच्या दुकानातून प्रसाद म्हणून काही पेढे (माझ्या जवळचा एक पेढा बाजुच्या चित्रात पहा.) घेतले, माझ्या पोटाला का तोंडाला बहुतेक तो पेढा पसंत नव्हता, मी थोडा खाल्ला प्रसाद म्हणून, बाकीचा अनिल भाऊजींच्या हातात दिला.....!!! मिनरल वॉटरची बॉटल तर एकट्या प्रविण भाऊजींनीच २/३ एवढी गटऽऽगटऽऽऽ करून खल्लास केली. तेथे मंदिराच्या गेटजवळील दुकानात पिंजर्‍यात एक पोपट होता. तेथे एक माणूस, बहुतेक माथेफिरू असावा, म्हणतो कसा, ह्या पोपटाचे दात काढलेत त्यामुळे तो चावणार नाही...! मग त्याने त्याची बोटे त्या पोपटाच्या चोचीत दिली अन जो‍र्‍यात ओरडला, कारण त्याच्या बोटांना तो पोपट कडाडून चावला, जसा की त्या पोपटाने त्याचा सर्व राग त्या माणसावर काढला असावा.....!!! बरं त्यानुसार आम्ही घरी जायच्या तयारीत होतो, पण दोन्ही भाऊजींच्या हालचालींवरून तसं वाटत नव्हतं. त्यांनी तेथूनच १-२ किमी लांब असलेल्या "भिमकुंड" या ठिकाणी, जेथे भिमाने बकासूराचा वध केला होता, तेथे जाण्याचे फिक्स केले. आम्हाला तर त्याची कल्पनाच नव्हती....! पण तेथे पद्मालयपेक्षा आम्ही जरा जास्तच मजा केली. यापुढील पोस्टमध्ये "भिमकुंड" बद्दल व तेथे केलेल्या आमच्या ट्रेकिंगबद्दल सांगेन, तोपर्यंत टाऽऽटाऽऽऽ........!!!!

पद्मालय येथे काढलेले फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा.

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre